’माहेर’चा ’साडी विशेषांक’

on Wednesday 27 April 2011

१२ मार्च १९११. पुण्यातल्या किर्लोस्कर नाटक मंडळीच्या बिर्‍हाडी सकाळपासूनच लगबग सुरू होती. काकासाहेब खाडीलकरांनी लिहिलेल्या ’संगीत मानापमान’ या नाटकाचा त्या दिवशी पहिला प्रयोग होता. नाटकातली गोविंदराव टेंब्यांची सुरेख पदं सर्वांनाच आवडली होती. नटसंचही जबरदस्त. भरदार देहयष्टीचे नानासाहेब जोगळेकर धैर्यधराच्या भूमिकेत तर गणपतराव बोडस लक्ष्मीधराच्या भूमिकेत होते. भामिनीची भूमिका साकारणार होते बालगंधर्व. किर्लोस्कर नाटक मंडळीनं कायमच आपल्या नाटकांनी प्रेक्षकांना भुरळ घातली होती. हे नाटकही इतिहास घडवेल, याबद्दल कोणाच्याच मनात शंका नव्हती. मात्र सकाळी तालीम संपत आली असतानाच एक तार आली, आणि सर्वांच्या उत्साहावर पाणी पडलं. बालगंधर्वांच्या लाडक्या लेकीचा मृत्यू झाला होता. ही बातमी ऐकताच बालगंधर्व कोसळले. इकडे रात्रीचा प्रयोग रद्द करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्या. पण बालगंधर्वांनी प्रयोग रद्द होऊ दिला नाही. स्वत:चं दु:ख बाजूला ठेवून ते प्रयोगाला उभे राहिले. शेवटी मायबाप प्रेक्षक हे त्यांचं दैवत. प्रेक्षकांना निराश कसं करणार? बालगंधर्व प्रयोगाच्या तयारीला लागले. शुचिर्भूत होऊन भरजरी शालू हाती घेतला. पाण्यानं ओला केला. रंगभूमी हे सर्वांत पवित्र ठिकाण. शरीर आणि वस्त्र शुद्ध केल्याशिवाय रंगमंचावर पाऊल ठेवायचं नाही, हा त्यांचा दंडक होता. शिवाय ओला शालू व्यवस्थित चोपून बसे.

त्या रात्री प्रयोग खासच रंगला. ‘धनी मी, पती वरीन कशी अधना?’ असं म्हणणारी भामिनी प्रेक्षकांना आवडली. ‘नुसत्या पराक्रमावर बायकांचे मनच बसत नाही. मनाची हौस भागेल इतके दागिने घालणारा नवरा बायकांना आवडतो’, अशी ऐट दाखवणारी भामिनी दुसर्‍या अंकात गरीब वनमालेच्या रूपात धैर्यधराचं प्रेम जिंकण्यास निघाली, आणि बालगंधर्वांना प्रेक्षकांनी आपल्या हृदयात कायमचं स्थान दिलं. बालगंधर्वांसारखं दिसणं, बोलणं, वागणं शिष्टसंमत झालं. बालगंधर्व वापरत तशाच साड्या, दागिने वापरू लागल्या. असं म्हणतात की, बालगंधर्वांनी स्त्रियांना साड्या कशा नेसाव्यात, दागिने कसे घालावेत ते शिकवलं. हजारो वर्षांपासून स्त्रियांना साड्या आणि दागिन्यांबद्दल असलेलं हे प्रेम एका पुरुषानं दृढमूल केलं.


                                                                                बालगंधर्व (इ.स. १९२४च्या सुमारास)


बालगंधर्वांच्या भामिनीला यंदा शंभर वर्षं पूर्ण झाली. बालगंधर्वांचं हे ऋण मान्य करत ’माहेर’ आणि ’मेनका’ आपल्यासाठी खास साड्या व दागिने यांना वाहिलेले अंक घेऊन आले आहेत. ’माहेर’च्या मे महिन्याच्या या अंकात साड्यांची विविध अंगांनी ओळख करून देणारा खास विभाग आहे. दक्षिण भारतातली साड्यांची बाजारपेठ, तिथले व्यवहार यांची ओळख करून देणारा खास लेख अश्विनी खाडिलकर यांनी लिहिला आहे. मानुषी यांनी साड्यांचा इतिहास, पेहरावात झालेले बदल यांचा मागोवा ’साडी : इति ते आदी’ या लेखात घेतला आहे. सुजाता राय यांनी त्यांच्या ’साडीवेड्या घरा’बद्दल लिहिलं आहे. शिवाय पूनम छत्रे, मिलिंद गाडगीळ यांच्या बहारदार कथाही आहेत.

नुकतंच स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५०% आरक्षण मिळालं. अनेक शतकांपूर्वी मुक्ताबाईंनी स्त्रीस्वातंत्र्याबद्दल, स्त्रियांच्या सबलीकरणाबद्दल लिहून ठेवलं होतं. मुक्ताबाईंच्या या अभंगांची ओळख मधुवंती सप्र्यांनी ’मुंगी उडाली आकाशी’ या लेखात करून दिली आहे. विकिपीडिया या आंतरजालावरील मुक्त ज्ञानकोशानं माहितीची कवाडं उघडी केली. अनेक किचकट विषय, ऐतिहासिक, साहित्यिक तपशील विकिपीडियामुळे लोकांना सहज उपलब्ध झाले. तेही त्यांच्याच मातृभाषेत. जगभरातली मंडळी या ज्ञानकोशाच्या निमित्तानं एकत्र आली. या प्रकल्पावर गेली काही वर्षं काम करणार्‍या संकल्प द्रविड यांनी ’खुलभर दुधाची कहाणी’ या लेखात या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली आहे. ’चाकोरीबाहेर’ या सदरात हेमलकशाच्या जंगलात काम करणार्‍या दिगंत-अनघा या आमटे कुटुंबातल्या तिसर्‍या पिढीचं कर्तृत्व चिन्मय दामले यांनी सांगितलं आहे. जिज्ञासा मुळेकर या अमेरिकेत असणार्‍या तरुण संशोधिकेनं आठवणीतल्या चाफ्याच्या झाडाबद्दल लिहिलं आहे. वळवाच्या पावसाची एक अस्वस्थ करणारी आठवण आपल्याला हणमंत शिंदे यांनी ’वळीव आलाय बया..वळीव’ या कथेत सांगितली आहे. याशिवाय या अंकात आहेत झरोका, सासर ही वाचकप्रिय सदरे आणि गौरी कालेकर , अदिती गोडबोले यांच्या कथा.

१ मेला ’माहेर’चा हा अंक उपलब्ध होईल. ’माहेर’चे वर्गणीदर होण्यासाठी कृपया http://menakaprakashan.com/subscriptions/ हे पान बघा..

नव्या रूपातलं ’माहेर’ कसं वाटलं, हे जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आपल्या प्रतिक्रिया, सूचना, अभिप्राय आम्हांला masik.maher@gmail.com या पत्त्यावर कृपया कळवा.

1 comments:

Anonymous said...

chhana vachayala hava :) - Meenakshi

Post a Comment